माध्यमिक शिक्षक सोसायटीचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन
शिक्षक सभासदांच्या मुलींच्या शिक्षणासाठी सुरक्षित निवासाची गरज; उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थिनींना दिलासा देण्यासाठी होस्टेल प्रकल्पाचा प्रस्ताव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी शहरात येताना निवासाच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्यासाठी सुरक्षित, सुसज्ज आणि अद्ययावत वस्तीगृह उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नगर शहरालगत 10 ते 15 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांची उपस्थिती होती. तसेच माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, संचालक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सुरज घाटविसावे, संचालिका वैशाली दारकुंडे, प्रा. सुधाकर सुंबे आदी पदाधिकारी यांनी या प्रश्नाबाबत आमदार जगताप यांचे लक्ष वेधले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे हजारो शिक्षक सभासद राज्यभर कार्यरत आहेत. त्यांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी अहिल्यानगर शहरात येणे आवश्यक ठरते. मात्र अनेक शिक्षक कुटुंबांकडे शहरात स्वतःची राहण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थिनींना सुरक्षित निवासाचा प्रश्न भेडसावत असतो. खासगी वसतिगृहे आणि भाड्याच्या घरांचा वाढता खर्चही पालकांसाठी आर्थिक भार ठरत असून, शिवाय सुरक्षिततेची हमी नसते.
विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरणात राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी माध्यमिक शिक्षक सोसायटीने स्वतंत्र वस्तीगृह उभारण्याचा संकल्प केला आहे. या वस्तीगृहामध्ये आधुनिक सुविधा, सुरक्षित निवास, अभ्यासिका, ग्रंथालय तसेच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी नगर शहराच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत 10 ते 15 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे करण्यात आली. शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थिनींना यामुळे मोठा आधार मिळेल तसेच त्यांच्या पालकांनाही दिलासा मिळणार असल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुलींच्या शिक्षणासाठी सुरक्षित निवास व्यवस्था ही काळाची गरज असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अशा वस्तीगृहांची आवश्यकता असून, हा प्रकल्प सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

