ॲड. सुरेश लगड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शासनाची फसवणूक?
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी आणि महिलांसाठी क्रांतिकारी ठरलेल्या योजनेत मोठा गैरप्रकार समोर आला आहे. या योजनेचा लाभ 2200 पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीरपणे कबूल केले आहे. यामुळे शासनाच्या शेकडो कोटींच्या निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन फौजदारी कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुरेश लगड यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक मदतीसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. मात्र, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी नियमांचे उल्लंघन करून आपले उत्पन्न लपवून लाभ घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाने अर्जांची छाननी सुरू केली असून, आयकर विभागाच्या मदतीने लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न तपासले जात आहे. या तपासणीत बोगस लाभार्थ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून, लाभार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.
सरकारी कर्मचारी ही योजना स्वतःसाठी वापरून शासनाच्या निधीची फसवणूक करत आहेत. केवळ त्यांनीच नव्हे, तर त्यांना सहकार्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी आहे. हा प्रकार म्हणजे शासनाची फसवणुक आहे. यावर सरकारने तातडीने फौजदारी कारवाई करावी, असे ॲड. सुरेश लगड यांनी म्हंटले आहे.