चर्मकार विकास संघाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन
शहरात अपघातांचे सावट; अवजड वाहतुकीवर बंदी हवी
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चर्मकार विकास संघाच्या वतीने शहरातील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची व सिग्नलवर भीक मागणाऱ्यांवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर आणि शहर जिल्हाध्यक्ष विनोद कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अरुण गाडेकर, संतोष कानडे, रुपेश लोखंडे, संतोष कांबळे, दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर शहरात सध्या काँग्रॅटीकरांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मजबूत रस्त्यांचे काम सुरू असून, नव्याने उघडलेल्या रस्त्यांचे व जनतेचे स्वरक्षण महत्त्वाचे आहे सध्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. विशेषतः अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अनेक वेळा अपघात घडत आहेत. काही अपघातांत निष्पाप नागरिकांचे जीव गेले असून, नुकताच प्रेमदान चौकात मोठ्या अवजड वाहनाचा घडलेला एक मोठ्या अपघात सुदैवाने जीवितहानी टळल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील चांगल्या रस्त्यांची अवस्था अवजड वाहनांमुळे खराब होऊ नये म्हणून नगरकरांनी काळजी घेणे महत्त्वाचे असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातून या वाहनांची दिवसा व रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची गरज आहे.
शहरातील दुसरा गंभीर मुद्दा म्हणजे सिग्नलवर लहान मुले व महिलांकडून भीक मागणे हा असून, डीएसपी चौक व इतर सिग्नलवर ही मंडळी प्रवाशांना त्रास देत असून, सिग्नल सुरू झाल्यावरही रस्त्यावरून हटत नाहीत. दिवसभर भीक मागणाऱ्या महिला सोबत लहान मुलांना घेऊन फिरत असतात, या लहान मुलांचे भविष्य अंधारमय होत आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होतोच, शिवाय अपघाताची शक्यता देखील वाढत आहे. काहीजण वस्तू विक्रीच्या नावाखाली जबरदस्ती करताना दिसतात. ही मंडळी नेमकी कोठून येतात, कुठे राहतात याचा शोध घेणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शहरात शिस्तबद्ध वाहतुकीसाठी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची व सिग्नलवर भीक मागणाऱ्यांवर बंदी आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.