आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देण्याचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील क्रेडिट एक्सेस इंडिया फॉउंडेशनच्या माध्यमातून क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या (ग्रामीणकुटा) वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस उप अधीक्षक जगदीश भांबल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. या प्रसगी संस्थेचे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कदम, क्षेत्रीय अधिकारी रविंद्र रकटाटे, शाखाधिकारी अमित कदम आदींसह पालक उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत गुणवत्ताधारक आणि गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य पुरविण्यात आले. या शिष्यवृत्तीचा आरती इथापे, स्नेहल सोनवणे, अनुष्का सातदिवे, श्यामल ठाणगे, समीक्षा दहातोंडे, साक्षी आव्हाड, अनुजा गर्जे, अक्षदा कदम या विद्यार्थिनीना लाभ मिळाला आहे.
पोलीस उप अधीक्षक जगदीश भांबल यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांचा भवितव्याचा विचार करुन क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेचे विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर कदम यांनी विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि शिक्षणाचे महत्त्व विशद केले.
मायक्रो फायनान्स कंपनी असलेल्या क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडने दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळून त्यांना सक्षम आणि स्वावलंबी बनण्यास मदत होणार असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडतर्फे दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याची यावेळी माहिती देण्यात आली.