घर घर लंगर सेवेच्या वतीने बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली
नगर (प्रतिनिधी)- काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन परिसरात झालेल्या अमानवी व भ्याड दहशतवादी हल्ल्याचा घर घर लंगर सेवेच्या वतीने निषेध करण्यात आला. या हल्ल्यात बळी पडलेल्या 26 निरपराध नागरिकांना तारकपूर येथील अन्न छत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या श्रद्धांजली कार्यक्रमात जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, मुन्ना जग्गी, राजू जग्गी, गुलशन कंत्रोड, प्रशांत मुनोत, सनी वधवा, सोमनाथ चिंतामणी, सुनिल थोरात, कैलाश नवलानी, डॉ. संजय असनानी आदी उपस्थित होते. उपस्थितांनी दहशतवादाचा जोरदार निषेध व्यक्त करुन भारत सरकारने याविरोधात ठोस पावले उचलण्याची मागणी केली.
जनक आहुजा म्हणाले की, काश्मीरमध्ये निष्पाप नागरिकांवर अमानुषपणे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी संपूर्ण मानवजातीवरच आघात केला आहे. पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्र दहशतवादी संघटनांना पाठीशी घालून भारताच्या अखंडतेवर घाला घालत आहेत. हा हल्ला म्हणजे मानवतेवर झालेला घात आहे. भारत सरकारने आता यापुढे शांत राहू नये आणि कठोर भूमिका घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हरजितसिंह वधवा म्हणाले की, दहशतवाद्यांच्या या कायर कृतींना आता तोंड द्यावे लागेल. धर्माच्या नावावर अशा प्रकारचे हिंसाचार घडवणे ही मानवतेची विटंबना आहे. काश्मीरमध्ये सातत्याने अशांतता माजवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. भारताने आता ठोस आणि निर्णायक धोरण स्वीकारण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटे मौन पाळून हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी भारत माता की जय…, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन परिसरात झालेल्या अमानवी व भ्याड दहशतवादी हल्ल्याचा घर घर लंगर सेवेच्या वतीने निषेध करण्यात आला. या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना तारकपूर येथील अन्न छत्रालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, मुन्ना जग्गी, राजू जग्गी, गुलशन कंत्रोड, प्रशांत मुनोत, सनी वधवा, सोमनाथ चिंतामणी, सुनिल थोरात, कैलाश नवलानी, डॉ. संजय असनानी आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)