करण कराळे, पुष्पाताई बोरुडे व सोनाबाई तायगा शिंदे यांचा सन्मान
बिनविरोध निवड म्हणजे कार्याची पोचपावती -सावन छाबरा
नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरून विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा बिनविरोध नगरसेवकांचा निर्धार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार करण कराळे, पुष्पाताई बोरुडे व सोनाबाई तायगा शिंदे यांचा सावेडी, रासनेनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाचे आयोजन सावन छाबरा परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी अनिल बोरुडे, सतीश शिंदे, पुष्कर कुलकर्णी, शिल्पा छाबरा, मनोज दुल्लम यांच्यासह अनिलशेठ वाबळे, सचिन पवार, गिरीश चिट्टा, गुलशन अरोरा, राकेश आहुजा, गिरीश ठमके, जस्वित पहुजा, आरव इंगळे, कयान छाबरा यांच्यासह परिसरातील नागरिक व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवकांचा फेटे बांधून पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. परिसराच्या विकासासाठी नेहमीच सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना बिनविरोध निवडून देत नागरिकांनी विश्वास व्यक्त केला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सावन छाबरा म्हणाले की, “महापालिकेत आज अभ्यासू, संवेदनशील आणि जनतेच्या प्रश्नांशी नाळ जोडणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नितांत गरज आहे. बिनविरोध निवडून येणे म्हणजे केवळ राजकीय यश नव्हे, तर त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची पावती आहे. नागरिकांनी दाखवलेला हा विश्वास मोठी जबाबदारी घेऊन आला आहे. मला खात्री आहे की, हे तिन्ही नगरसेवक प्रामाणिकपणे काम करून परिसराचा सर्वांगीण विकास साधतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित बिनविरोध नगरसेवकांनी सांगितले की, “नागरिकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. बिनविरोध निवडून येणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, त्याचबरोबर मोठी जबाबदारीही आहे. स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम केले जाईल. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न महापालिकेत ठामपणे मांडून परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
