• Tue. Oct 28th, 2025

कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केंद्राबद्दल जागृती

ByMirror

Aug 15, 2024

कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी जागृती व सुसंवाद केंद्र मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन

प्रेमळ नातेसंबंध टिकवण्यासाठी मध्यस्थी ही सुंदर प्रक्रिया -न्यायाधीश संगीता ना. भालेराव

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रेमळ नातेसंबंध टिकवण्यासाठी मध्यस्थी ही सुंदर प्रक्रिया आहे. दोघांना समान संधी व न्याय मिळतो. वाद लवकर मिटतात, यामध्ये कोणाचाही पराभव अथवा विजय होत नसतो. दोन्ही पक्षकारांचा यामध्ये विजय असतो. नातेसंबंध सलोख्याचे राहून पुढे टिकवण्यासाठी ही प्रक्रिया सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता ना. भालेराव यांनी केले.


जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या संयुक्त विद्यामाने जुने न्यायालय येथील कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी जागृती व सुसंवाद केंद्र मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मार्गदर्शन करताना न्यायाधीश भालेराव बोलत होत्या. याप्रसंगी औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश समीना खान, कामगार न्यायालयाचे प्रशासकीय न्यायाधीश एस.जी. देशपांडे, द्वितीय न्यायाधीश ए.जी. देशमुख, सहकार न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. लखोटे, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. राजेश कावरे, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, सहसचिव ॲड. रोहिणी उंडे-नगरकर आदींसह वकील व पक्षकार उपस्थित होते.


प्रास्ताविकात ॲड. लक्ष्मण कचरे यांनी आजच्या काळात मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व विशद करुन, यामध्ये दोन्ही पक्षकारांचा वेळ व पैसा वाचून समुपदेशनाने वाद मिटत असल्याचे स्पष्ट केले. ॲड. सुरेश लगड म्हणाले की, कौटुंबिक वाद मध्यस्थीद्वारे मिटवले जाऊ शकतात. दोन्ही पक्षकारांचा यामध्ये फायदा व समाधान असतो. वर्षानुवर्षे चाललेल्या प्रकरण अल्पावधीत चर्चेने व समोपचाराने मिटून एकमेकांबद्दल असलेली कटुता दूर होत असल्याचे त्यांनी सांगितले.


न्यायाधीश बी.एस. लखोटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जी प्रकरणे मध्यस्थी व समोपचाराने मिटवण्याच्या गाईडलाईनची माहिती दिली. तर मध्यस्थी प्रकरणात वकिलाचा भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. अर्चना झिंजे यांनी एक पात्री नाटकातून मध्यस्थीने कौटुंबिक वाद कसा मिटवला जातो? यावर प्रयोग सादर केला. यामध्ये न्यायाधीश भालेराव यांनी देखील नवरा-बायकोचे वाद मध्यस्थीने मिटवण्यासाठी न्यायाधीशाची भूमिका बजावली.


यावेळी माजी अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, माजी उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ शिर्के, सुप्रिटेंडेंट सुधीर काकडे, धीरज नारखेडे, शेखर मेहेत्रे, अविनाश सुर्यवंशी, रंगनाथ गवळी, गजानन देशमुख, मुकरम शेख, कविता बारेल, अशोक राहिंज, संतोष अळकुटे, भगवान मॅडम, ॲड. ज्ञानेश्‍वर दाते, ॲड. अक्षय काळे, ॲड. भक्ती शिरसाठ, ॲड. बेबी बोर्डे, ॲड. अनया कुलकर्णी, ॲड. लता गांधी, ॲड. जया पाटोळे, ॲड. प्रियंका धीवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शिवाजी सांगळे यांनी केले. आभार ॲड. राजेश कावरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *