• Fri. Mar 13th, 2026

अर्बन बँक घोटाळा प्रकरणी गांधी फिनकॉर्पची चौकशी करा

ByMirror

Aug 21, 2023

ज्या वर्षी बँकेत घोटाळा झाला त्याचवर्षी गांधी फिनकॉर्पची स्थापना

आशुतोष लांडगे यांचे आर्थिक गुन्हे शाखेकडे निवेदनासह कागदपत्रे सादर

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणाच्या काळातच गांधी फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली आहे. कंपनीच्या भागभांडवलासाठी वापरलेली अडीच कोटींची रक्कम बँकेच्या घोटाळ्यातीलच असावी, याच कंपनीमार्फत बँकेच्या घोटाळ्यातील रकमा देशाबाहेर नेल्याची शक्यता असल्याचा दावा आशुतोष लांडगे यांनी केला आहे. तर अर्बन बँकेच्या दीडशे कोटीच्या घोटाळ्याच्या तपासात या कंपनीची ही चौकशी करण्याची मागणी आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे त्यांनी तपास अधिकारी यांच्याकडे सादर करुन तपासाला गती देण्याची मागणी केली आहे.


आशुतोष लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन चेअरमन माजी खासदार दिलीप गांधी व बँक कर्मचाऱ्यांनी माझ्या परस्पर व इतर खातेदारांच्या खात्यातून आणि कर्ज वेगवेगळ्या इतर खात्यात पैसे वर्ग करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गांधी फिनकॉर्प लिमिटेड कंपनी 2017 मध्ये म्हणजेच बँकेत कर्ज फसवणुक झालेल्या वर्षी स्थापित झालेली आहे. या कंपनीच्या भागभांडवलाचे अडीच कोटी अर्बन बँक घोटाळ्यातीलच असण्याची दाट शक्यता आहे.


बँक घोटाळ्यातील रोख रक्कम मुख्य आरोपीचे मुले सुवेंद्र दिलीप गांधी व देवेंद्र दिलीप गांधी व त्यांचे भागीदार जयदीप पाटील यांनी गांधी फिनकॉर्प या कंपनीमार्फत देशाबाहेर नेऊन विल्हेवाट लावली असावी. प्रकरण टाळण्यासाठी सुवेंद्र दिलीप गांधी बँकेच्या रकमा कोर्ट किंवा सदर प्रकरणातील फिर्यादीकडे जमा करण्याची दाट शक्यता आहे. याची सखोल चौकशी होऊन अर्बन बँकेच्या घोटाळ्यातील रोख रकमांची कशी विल्हेवाट लावली याची शहानिशा होणे आवश्‍यक आहे. यासाठी सुवेंद्र गांधी व देवेंद्र गांधी यांची चौकशी केल्यास अर्बन बँकेच्या दीडशे कोटी घोटाळ्यातील पडद्यामागचे मुख्य सूत्रधार समोर येणार असल्याचे पत्रात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *