यशस्वी होण्यासाठी जीवनात शिस्त महत्त्वाची -डॉ. आशिष भंडारी
भुली बिसरी यादे.. मधून जुन्या आठवणीना उजाळा तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे दर्शन
नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. चे रुपीबाई मोतीलालजी बोरा-न्यू इंग्लिश स्कूल, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले. तसेच विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भरविण्यात आलेल्या कला, कार्यानुभव, रांगोळी, गणित व विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संध्याकाळी संस्थेच्या डॉ.आर.बी. मोने कला मंदिरात स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. पहिल्या दिवशी (इयत्ता 5 वी ते 8 वी) झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आदर्श सरपंच रोहिणीताई लवांडे तर दुसऱ्या दिवशी (इयत्ता 9 वी ते 12 वी) झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आनंदऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासनाधिकारी डॉ. आशिष भंडारी यांच्या हस्ते झाले. यावेळी पायल भंडारी, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त सुनंदाताई भालेराव, ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार भूषण भंडारी, विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ, उपप्राचार्या वंदना आरण्ये, पर्यवेक्षक बाळासाहेब वाबळे, शिक्षक प्रतिनिधी नितीन कमलकर, विद्यालयाचे आदर्श छात्र सिद्धार्थ लांडगे, सोहम गांधी, आदर्श छात्रा संचिता लांडगे, कीर्ती गुंड आदींसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी केले. त्यांनी विद्यालयातील गुणवत्ताधारक तसेच कला, क्रीडा व विविध क्षेत्रातील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करत विद्यालयाच्या प्रगतीबद्दल कौतुक केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ यांनी सर्व पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे प्रदर्शन पाहून तयार केलेल्या विविध कलाकृतींचे व त्यांच्यातील जिज्ञासूवृत्तीचे भरभरून कौतुक केले.
आदर्श सरपंच रोहिणीताई लवांडे यांनी माजी विद्यार्थी या नात्याने शाळेविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी आदर्श गाव निर्मिती करण्यापासून ते माजी राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार मिळेपर्यंतच्या खडतर प्रवासाचे वर्णन करत वेळोवेळी शालेय जीवनातील शिस्त आणि संस्कार याचा कसा फायदा झाला? याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ. आशिष भंडारी यांनी आपल्या शालेय जीवनातील संस्कार व शिस्तीचा उपयोग त्यांना दररोजच्या प्रशासकीय कामात होत असून, त्या संस्कारांमुळेच निर्माण झालेल्या सामाजिक जाणीवेतून दररोज समाजातील सर्व थरांतून येणाऱ्या रुग्णांची सेवा केली जाते. कोरोना या जागतिक महामारीमध्ये आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेबद्दल कोरोना योद्धा हा पुरस्कार मिळाला तर जनतेकडून देवदूतची उपाधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथींचे स्वागत घोषपथकाच्या माध्यमातून करत मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या एन.सी.सी. छात्रांनी पाहुण्यांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीतांद्वारे मान्यवरांचे सूर-तालात स्वागत केले. सदर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक, कला, क्रीडा व विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण देऊन सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सुमारे 80 ढोलवादक विद्यार्थ्यांच्या घोषपथकाने झाली. विद्यार्थ्यांनी बालगीते नाच रे मोरा.. गणेशवंदना..खंडोबाचा जागर.. या लोकप्रिय गीतांवर लयबद्ध सादरीकरण केले. सहभागी सर्वांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. यावर्षी इ.5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांनी भुली बिसरी यादे.. तर इ.9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी अस्मिता महाराष्ट्राची… या विषयावर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
भुली बिसरी यादे.. मध्ये अनेक जुन्या गाण्यांच्या माध्यमातून जुन्या आठवणीना उजाळा देण्य्यात आला तर अस्मिता महाराष्ट्राची.. मधील गाण्यांद्वारे आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कराळे व मोनाली खोचरे यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ नजान व स्मिता कुलकर्णी यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधी नितीन कमलकर यांनी मानले.
