• Tue. Jun 3rd, 2025

हरित क्रांतीसाठी सुजलाम्‌ सुफलाम्‌ मलयज शीतलम्‌ या त्रिसूत्रीवर आधारित अभिनव उपक्रम

ByMirror

May 27, 2025

पाण्याच्या थेंबथेंबातून हरित भविष्याकडे वाटचाल; पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार


रेन गेन बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे जलसंधारण, शेती समृद्धी व हवामान शितलीकरणाचा नवा मार्ग


ही केवळ तांत्रिक योजना नसून निसर्गाशी सुसंवाद साधणारी हरित चळवळ -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- पृथ्वीवर पावसाचे पाणी हे अनमोल वरदान असले तरी त्याचा अपव्यय व योग्य साठवणुकीअभावी भारतात अनेक भागांत दुष्काळाची स्थिती उद्भवते. यावर्षी होत असलेल्या अधिक पावसामुळे त्या पाण्याची योग्य नियोजन होण्याची गरज आहे. या समस्येवर दूरगामी उपाय म्हणून पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने ग्लोबल सुजलाम्‌ सुफलाम्‌ मलयज शीतलम्‌ या त्रिसूत्रीवर आधारित योजना सादर करण्यात आली आहे. ही योजना रेन गेन बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलावर मात करण्याचा नवा अध्याय घडवणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


या योजनेचा कणा ठरतो तो म्हणजे, रेन गेन बॅटरी तंत्रज्ञान. ही बॅटरी म्हणजे 5 फूट खोल आणि 3 बाय 3 फूट आकाराचा खड्डा असून त्यात दगडगोटे आणि वर मुरूम भरलेला असतो. या माध्यमातून पावसाचे पाणी गुरुत्वाकर्षणाने लगेच जमिनीत झिरपत जाते आणि भूजल साठा वाढतो. यामुळे झाडांना उन्हाळ्यातही आवश्‍यक ओलावा मिळतो, परिणामी ट्रान्सपिरेशनद्वारे हवामानात थंडावा निर्माण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


सुजलाम्‌ जलसंपदा वाढवण्यासाठी प्रत्येक घर, शाळा व संस्था यांच्यासाठी रूफटॉप व बोअरवेल रेन गेन बॅटरीचे नियोजन करणे. पावसाचे पाणी वाया न जाता भूमीत झिरपवून भूजल वाढवणे. बोअरवेलचे पुनरुज्जीवन व जलसंपत्तीतील स्वावलंबन साधणे. सुफलाम्‌ समृद्ध शेतीसाठी कोरडवाहू जमिनीवर धनराई शेती (फळझाडे, औषधी वनस्पती) उभारणे. ठिबक सिंचनासोबत भूमिगत ओलावा राखून पिकांची टिकवणूक करणे. मलयज शीतलम्‌ हवामानातील थंडावा निर्माण होण्यासाठी वृक्षलागवड आणि हरित पट्टा निर्माण करून उष्णतेवर नियंत्रण मिळवण्याचा समावेश आहे.


त्रैहरीत मॉडेल तीन स्तंभांवर आधारित हरित क्रांती आहे. पावसाचे साठवण, रेन गेन बॅटरीद्वारे भूजलात पाणी झिरपविणे व सौर ऊर्जा साठवणूक सौर पॅनेल्सद्वारे स्वच्छ ऊर्जा वापर यांचा अंतर्भूत करणे. अंमलबजावणीचे टप्पे म्हणून प्रथम टप्पा शाळा, ग्रामसभा, शिबिरे यांद्वारे जनजागृती व प्रशिक्षण. द्वितीय टप्पा शहरी व ग्रामीण भागात रेन गेन बॅटरीची उभारणी व वृक्षलागवड. तृतीय टप्पा कृषी योजनांच्या माध्यमातून निधी व धोरणे अंमलात आणण्याचे म्हंटले आहे.


यामुळे पाणी संरक्षण, भूजल वाढ, दुष्काळप्रतिकारकता, शेती समृद्धी उत्पन्नवाढ, रोजगारनिर्मिती, स्वयंपूर्णता, हवामान सुधारणा थंड वारे, सावली, पर्यावरणीय संतुलन, ऊर्जा सुरक्षा, सौर ऊर्जा वापर, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छ हवा, अधिक ऑक्सिजनचे फायदे नागरिकांना मिळणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.


ग्लोबल सुजलाम्‌ सुफलाम्‌ मलयज शीतलम्‌ योजना ही केवळ तांत्रिक योजना नसून निसर्गाशी सुसंवाद साधणारी हरित चळवळ आहे. पाण्याच्या थेंबांची किंमत ओळखून, झाडांच्या सावलीत थंडावा अनुभवण्याची ही चळवळ प्रत्येक व्यक्तीच्या सहभागाची अपेक्षा करते. ही योजना भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक नवा दिशादर्शक ठरू शकणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *