अप्पू हत्ती चौकात पुतळा उभारण्याची एकमुखी मागणी; बैठकीसाठी समाज बांधवांची उपस्थिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे (जुना अप्पू हत्ती) चौक येथे सध्या उभारण्यात आलेल्या अश्वाच्या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी केडगावातील सकल मातंग समाज एकवटला आहे. या मागणीसंदर्भात छत्रपती शिवाजी मंगल कार्यालय, अंबिकानगर (केडगाव) येथे सकल मातंग समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत समाजबांधवांनी एकमुखाने अश्वारूढ पुतळ्याची मागणी करत ती महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
बैठकीस उपस्थित नगरसेवकांनी समाजाच्या भावनांचा आदर राखत हा विषय महापालिकेच्या आगामी महासभेच्या अजेंड्यावर घेऊन बहुमताने मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा शब्द समाजबांधवांना दिला. बैठकीच्या प्रारंभी केडगाव सकल मातंग समाजाचे समन्वयक प्रा. विशाल पाचारणे यांनी उपस्थित मान्यवर आणि समाजबांधवांचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात माजी प्राचार्य ना. म. साठे, रविंद्र शेलार, निवृत्ती साळवे, मनोज साठे, सयाजी अवचिते, विकास उडानशिवे, भगवान जगताप, संदीप सकट आणि श्याम वैराळ यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. सर्वांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याला साजेसा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यक्रमास नगरसेवक दत्ता गाडळकर आणि वर्षाताई काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी समाजाच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत संबंधित प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत मांडून मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले इंजि. सुधाकर पाचारणे यांनी स्मारक उभारणीसाठी समाजाने आता अधिक संघटितपणे पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. “लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी पुढील काळात आर्थिक निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. समाजाच्या सहकार्याने हा लढा यशस्वी करू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात ॲड. प्रदीप सकट यांनी महापालिकेच्या निधीचा वापर आणि संबंधित जागेच्या हस्तांतरणासंदर्भातील कायदेशीर बाबी नगरसेवकांसमोर मांडल्या. अशा ऐतिहासिक स्थळी समाजाच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठक यशस्वी करण्यासाठी धनंजय पाचारणे, सनी पाचारणे, राजू बोरगे, महेश लोखंडे, विष्णू लोखंडे, संतोष उमाप, अक्षय बोरगे, गोरख लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. यावेळी माजी नगरसेवक अनिल शेकटकर, सुनिल उमाप, अश्विनी पाचारणे, श्रुती लोखंडे, आशा ससाणे, उषा शिंदे, पूनम पाचारणे, आशा पाचारणे, अमित भांड, वैभव पाचारणे, संजय बोरगे, उद्योजिका रेश्मा पाचारणे, आदित्य उमाप, पियूष बोरगे, किरण पाचारणे यांच्यासह केडगाव परिसरातील मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल पाचारणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समिती अध्यक्ष संतोष साळवे यांनी मानले.
लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी समाजाची एकजूट
बैठकीत उपस्थित सर्व समाजबांधवांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक चौकात त्यांचाच अश्वारूढ पुतळा उभारणे ही समाजाची केवळ मागणी नसून ऐतिहासिक न्यायाची बाब असल्याचे मत व्यक्त केले. समाजाच्या भावना लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली.

