बेकरीतील कामगारांवर झाला होता जीवघेणा हल्ला
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. 4 एम.एच. शेख यांनी बेकरी हल्ला प्रकरणातील आरोपी आकाश सुनील पवार व जयेश लक्ष्मीकांत लासगरे या दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
बेकरी हल्ला प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले सदरचे आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यांच्या वतीने आज न्यायालयापुढे जामीन अर्ज ठेवण्यात आला होता. त्यामध्ये फिर्यादीच्या बाजूने ॲड. संकेत नंदू बारस्कर यांनी सविस्तर लेखी म्हणणे देऊन युक्तिवाद केला असता न्यायलयाला सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून, फिर्यादीस जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण करण्यात आली होती. सदर आरोपींना जामिनावर सुटका केल्यास फिर्यादीस व त्यांच्या कुटूंबाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
तरी सदर आरोपींचे जमीन अर्ज रद्द होवून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ॲड. संकेत नंदु बारस्कर यांनी न्यायालयास केली. यावर आरोपी पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू न्यायालयाने सदर प्रकरणामध्ये असलेला आरोपींचा सहभाग तसेच फिर्यादीस झालेली मारहाण, अश्या सर्व बाबींचा विचार करून दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज सोमवारी (दि.29 जुलै) रोजी फेटाळून लावला.
या प्रकरणात कासीम कासार (जखमी) यांच्या वतीने ॲड. संकेत नंदु बारस्कर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. प्रकाश सावंत, ॲड. स्वप्नील खरात, ॲड. आकाश अकोलकर यांनी सहकार्य केले.