आजचे विद्यार्थी हे उद्याच्या सक्षम भारताचे भवितव्य -सुजय मोहिते
अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळेत लांबून पायी येणाऱ्या गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार देण्याच्या उद्देशाने केडगावच्या विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले. सुजय अनिल मोहिते मित्र परिवाराच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने गरजू विद्यार्थ्यांना 35 सायकलीचे वाटप करण्यात आले.
केडगाव येथील एस.एस. मोहिते माध्यमिक विद्यालयात झालेल्या सायकल वाटप कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, सुवेंद्र गांधी, अनिल मोहिते, अनुराग आगरकर, राजेंद्र सातपुते, अनिकेत निंबाळकर, संकेत गाडेकर, वैभव चोपडे, सौरभ हिवाळे, प्रसाद घागरे, चैतन्य गंधे आदींसह राजमुद्रा ग्रुप व भाजप नगर शहरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महेंद्र गंधे म्हणाले की, शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी लागेल. काहीतरी उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर नजर ठेऊन संधीचे सोने करावे. सायकलची मिळालेली भेट ही मदत नव्हे तर शिक्षणासाठी प्रोत्साहन आहे. परिस्थितीतून स्वत:चे अस्तित्व सिध्द करण्याचे त्यांनी सांगितले.
सुजय मोहिते म्हणाले की, आजचे विद्यार्थी हे उद्याच्या सक्षम भारताचे भवितव्य आहे. त्यांचे भवितव्य उज्वल घडल्यास देश सक्षम होणार आहे. यासाठी प्रत्येकाने गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी हातभार लावण्याची गरज आहे. केडगाव मध्ये शाळेत शिकणारी अनेक विद्यार्थी लांबून पायी चालत येत असतात. त्यांना शाळेत येण्या-जाण्याची सोय होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सुवेंद्र गांधी यांनी गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता राबविण्यात आलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात 15 तर उर्वरीत 25 सायकलीचे विविध शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.