हर्ष घाडगे व योशना मंडलेचा ठरले प्रथम
मुलांच्या बुध्दीला चालना देण्यासाठी बुध्दीबळ हा खेळ सर्वोत्तम -महेंद्र गंधे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांच्या हातात मोबाईल आल्याने त्यांचा बौध्दिक व शारीरिक विकास खुंटला आहे. मुलांच्या बुध्दीला चालना देण्यासाठी बुध्दीबळ हा खेळ सर्वोत्तम असून, यामुळे मन एकाग्र होते. या खेळात बुद्धीचा कस लागत असल्याने मुलांच्या बुध्दीला चालना मिळून कुशाग्र होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 13 वर्षा खालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन जुना कापड बाजार येथील नागर महाजनवाडी सभागृहात झाले. गंधे व भिंगार कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी बुद्धिबळ पटावर चाल देऊन या स्पर्धेला सुरुवात केली. याप्रसंगी गंधे बोलत होते. यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारूनाथ ढोकळे आदींसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे गंधे यांनी भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपयी यांच्या 25 डिसेंबर रोजी असलेल्या जन्मदिनानिमित्त शहरात खुल्या बुध्दीबळ स्पर्धा घेणार असल्याचे जाहीर केले.

प्रास्ताविकात यशवंत बापट यांनी बुध्दीबळ खेळात संयम आवश्यक असून, संयम व चिकाटीने यश गाठता येते. अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. यासाठी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचे सहकार्य लाभत असून, अनेक उत्तम खेळाडू पुढे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नरेंद्र कुलकर्णी म्हणाले की, बुद्धिबळाच्या प्रचार प्रसारासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने कार्य सुरु आहे. पालकांनी देखील हा खेळ समजावून घ्यावा व मुलांसाठी वेळ देण्याचे त्यांनी आवाहन केले. वसंत राठोड यांनी बुध्दीबळ खेळ जिवंत ठेवण्यासाठी संघटना देत असलेले योगदान प्रेरणादायी आहे. संघटनेच्या प्रोत्साहनामुळे जिल्ह्यातील खेळाडू राज्य व देश पातळीवर आपल्या शहराचे नांव उंचावत असल्याचे सांगितले.
या स्पर्धेला जिल्ह्यातील खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये अवघ्या चार वर्षाचे खेळाडू देखील सहभागी झाले होते. तसेच विविध स्पर्धेत यश मिळविणार्या गुणवंत खेळाडूंना रोख बक्षिस देऊन पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
चिमुकल्या खेळाडूंनी देखील उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. बुद्धिबळ पटावर काही अटीतटीच्या सामन्यांचा अनुभव उपस्थित पालक व बुध्दीबळ प्रेमींना घेण्यात आला. 45 खेळाडूंमध्ये 5 फेर्यात बुध्दीबळाचे सामने रंगले होते. मुलांमध्ये प्रथम- हर्ष घाडगे (यशश्री अकॅडमी), द्वितीय-रियान खंडेलवाल (डॉ. विखे पाटील स्कूल), मुलीं मध्ये प्रथम- योशना मंडलेचा (होम स्कूल), द्वितीय- प्रांजली आव्हाड (स्वामी विवेकानंद विद्यालय, पाथर्डी) यांनी बक्षिसे पटकाविली. पंच म्हणून देवेंद्र ढोकळे व चेतन कड यांनी काम पाहिले. या खेळाडूंची नागपूर येथे होणार्या राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. हे खेळाडू अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले. आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.
