अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पिडीत तक्रारदारांना धमकावणे व मारहाण होत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील तो पोलीस अधिकारी व त्याचे काही पोलीस कर्मचारी पिडीत तक्रारदारांवर कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद नसताना, रात्री-अपरात्री त्यांच्या घरी जावून मारहाण करणे व अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी धमकाविण्याचे प्रकार करत असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
या संबंधित पोलीस कर्मचारी यांचे ड्युटी रजिस्टर नक्कल व ड्युटी बटवडा तक्त्याची तपासणी करुन अहवाल तयार करण्याची मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या पंधरा दिवसात याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास पिडीत तक्रारदारांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पारनेर पोलीस निरीक्षक व त्यांचे काही पोलीस कर्मचारी जाणीवपूर्वक पिडीत तक्रारदारास वेठीस धरून कुठलेही गुन्हे नोंद नसताना, जाणीवपूर्वक मारहाण करून अर्थपूर्ण संबंध तयार करत आहे. संबंधित पोलीसांविरोधात असलेल्या तक्रारीनुसार त्यांचे मोबाईल लोकेशन, मोबाईलची सीडीआर तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक यांचे ड्युटी रजिस्टर दैनंदिन नक्कलची तत्पर तपासणी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तक्रारदारांना त्रास देणार्या पोलीस कर्मचार्यांची ड्युटी बटवडा तक्ता दैनंदिन नुसार 1 जानेवारी 2022 ते आजतागायत तपासणी करण्यात यावा व त्याचा अहवाल तयार करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
