अण्णाभाऊ व टिळकांनी अन्यायाविरोधात समाज जागृती केली -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
गावातील शाळेत झालेल्या अभिवादन कार्यक्रमासाठी प्र. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, अमोल वाबळे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तेजस केदारी, भानुदास लंगोटे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, प्रशांत जाधव, तृप्ती वाघमारे, प्रमोद थिटे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक वर्गासाठी संघर्ष केला. श्रमिक वंचितांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी शाहिरीतून समाज जागृतीचे कार्य केले. वयाच्या सोळाव्या वर्षी कामगार चळवळीत सहभागी होऊन त्यांनी कष्टकरींच्या व्यथा मांडल्या. त्यांचे लिखाण मानवी जीवनाला नवा विचार देणारे आहे. तर लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटीशांविरोधात समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. दोन्ही महापुरुषांनी अन्यायाविरोधात जागृती करुन समाजाला दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, सूचना एवं प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. फणिकुमार यांचे मार्गदर्शन लाभले.
