ज्येष्ठ कवी व साहित्यिकांची राहणार उपस्थिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काव्य संमेलनात लेखक गिताराम नरवडे लिखित होरपळ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. होरपळच्या माध्यमातून लेखकाने ग्रामीण भागातील वेदनांचा हुंकार भरला असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शनिवारी (दि.27 मे) नगर-कल्याण रोड येथील अमरज्योत लॉन मध्ये काव्य संमेलन होणार आहे. यावेळी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आमदार निलेश लंके व आमदार तथा ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे. कवी संमेलनासाठी संजय कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, माजी प्राचार्य सुभानजी खैरे, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, शशिकांत शिंदे, चंद्रकांत पालवे, बाबूराव उपाध्ये, प्रा. शंकर चव्हाण, मुनतोडे, बाळासाहेब अमृते उपस्थित राहणार आहे.
होरपळ या पुस्तकात लेखक गिताराम नरवडे यांनी ग्रामीण वेदनेचे ज्वलंत प्रश्न मांडले आहे. उपेक्षित कुटुंबाचे अंतरंग होरपळणारे वास्तव यामध्ये आहे. तर वेदनांचे दर्शन घडविण्यात आले आहे. सामाजिक वास्तववादाला जागरुकतेचा आधार देऊन ग्रामीण जीवनवास्तवाचा शोध घेण्यात आला आहे. या पुतस्कातून सांस्कृतिक अस्मिताशोधनाचा ऊर्जास्त्रोत निर्माण करण्यात आला आहे. ग्रामीण भागाची सर्व बाजूंनी झालेली कोंडी, त्यात होरपळलेल्या ग्रामीण जीवनाचे शोषण आणि दु:खाला नरवडे यांनी शब्दरुप केले आहे.