• Tue. Jul 1st, 2025

केडगावच्या रेल्वे पुलावर पाऊण तास वाहतुक कोंडी

ByMirror

Dec 30, 2024

दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगाच-रांगा

अवजड वाहनांनी शहरातील वाहतुकीचे तीन तेरा

नगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे महामार्गावरुन केडगाव मार्गे शहरात येणारी व जाणारी अवजड वाहने ही नित्याचीच बाब झाली असताना, रविवारी (दि. 29 डिसेंबर) संध्याकाळी नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे पुलावर अवजड सामानाची वाहतुक करणारा कंटेनर अचानक बंद पडल्याने वाहतुक कोंडी झाली होती. यश पॅलेस चौक ते केडगाव येथील अंबिका बस स्टॉप पर्यंत संपूर्णपणे वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल पाऊण तास नागरिक या वाहतुक कोंडीत अडकले होते. अवजड वाहनांनी शहरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून, शहर वाहतुक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.


वाहतुक कोंडी व अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरात घुसणारी अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी नागरिकांमधून होत असताना सर्रासपणे शहरात अवजड वाहने दिवसाढवळ्या येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथून आलेला एमएच 46 बीयू 4567 क्रमांकाचा कंटेनर केडगाव येथील रेल्वे ब्रिजवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना पुल चढताना मध्येच बंद पडला. यामुळे वाहतुक कोंडी होवून रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या होत्या.

तर दोन रुग्णवाहिका देखील यामध्ये अडकून पडल्या होत्या. सदर वाहतुक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतुक पोलीस देखील वेळेवर हजर नसल्याने नागरिकांनी स्वत:हून रस्त्यावर थांबून वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.


वाहतूक सुरळीत करण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने अनेक तास नागरिक वाहतुक कोंडीत अडकले होते. शहरात दिवसा अवजड वाहनांना बंदी असताना देखील वाहने शहरात येतात कशी? हा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. अवजड वाहनांनी अनेकांचा बळी घेतला असताना देखील, वाहतुक पोलीस कारवाईसाठी आनखी किती जणांच्या बळीची वाट पाहणार असल्याचा मुद्दा नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *