“भोंदूगिरीविरोधात संतापाचा उद्रेक; ‘सूर्यसाक्षी शेण लाडू’ अभियानातून अनोखा निषेध”
अंधश्रद्धेविरोधात कडक कारवाईची मागणी; ‘स्वच्छ भारतानंतर आता स्वच्छ मन’ समाजपरिवर्तनाचा संदेश”
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने भविष्य सांगण्याच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरात च्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे पार पडलेल्या या आंदोलनात “सूर्यसाक्षी शेण लाडू अभियान” राबवत भोंदूगिरीचा निषेध नोंदवण्यात आला. खरातच्या प्रतिकात्मक पुतळ्यास शेणाचे लाडू खाऊ घालून जोडे मारण्यात आले.
आंदोलनाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करून करण्यात आली. यावेळी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, वीर बहादुर प्रजापती, ओम कदम, पोपट शेळके, अशोक भोसले
यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनादरम्यान अशोक खरात याच्या भोंदूगिरीचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच त्याच्या संपर्कात असलेल्या मंत्री, आमदार आणि कथित भोंदू समर्थकांवरही टीका करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी राज्यात अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
“सूर्यसाक्षी शेण लाडू अभियान” हे केवळ निषेध आंदोलन नसून समाजातील चुकीच्या समजुतींवर थेट प्रहार करणारा एक सामाजिक प्रयोग असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. “शेण लाडू” हे प्रतीक वापरून शुद्ध-अशुद्ध या पारंपरिक संकल्पनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
“स्वच्छ भारतानंतर आता स्वच्छ मन” ही संकल्पना मांडत, समाजातील अंधश्रद्धा, जातीयता, स्त्रीदास्य व मतदारदास्य या अमानवी विचारसरणी बदलण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. आयोजकांच्या मते, 9 ते 18 वर्षे हा मुलांच्या विचारघडणीचा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. याच वयात श्रद्धा, मूल्ये आणि सामाजिक दृष्टिकोन तयार होतात. त्यामुळे या वयोगटासाठी विशेष शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवणे अत्यावश्यक आहे. जात, अंधश्रद्धा आणि भेदभाव हे जन्मजात नसून समाजातून शिकले जातात. त्यामुळे योग्य शिक्षण व जागृतीच्या माध्यमातून त्यामध्ये बदल घडवून आणणे शक्य आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, आज समाजात विज्ञानाच्या नावाने प्रगती होत असली तरी अंधश्रद्धेचे जाळे अजूनही घट्ट विणले गेले आहे. काही भोंदू लोक लोकांच्या भीतीचा आणि अज्ञानाचा फायदा घेतात. हे थांबवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर समाजाने जागरूक होणे गरजेचे आहे. ‘सूर्यसाक्षी शेण लाडू’ हा उपक्रम लोकांच्या मनातील अंधश्रद्धेवर प्रहार करणारा असल्याचे ते म्हणाले.
अशोक सब्बन म्हणाले की, भोंदूगिरी ही केवळ अंधश्रद्धा नसून ती एक प्रकारची सामाजिक फसवणूक आहे. लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना चुकीच्या मार्गावर नेले जाते. अशा प्रवृत्तीला थारा देणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. समाजाने विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश थोरात म्हणाले यांनी सांगितले की, अशोक खरातसारख्या भोंदू लोकांना काही पुढाऱ्यांचे अप्रत्यक्ष समर्थन मिळाल्यामुळे त्यांची मजल वाढली आहे. अशा लोकांनी समाजातील महिलांच्या सन्मानालाही धक्का दिला आहे. त्यामुळे भोंदूगिरीला पाठिंबा देणारे राजकीय नेतेही तितकेच जबाबदार आहेत. ‘अंधश्रद्धा पोसणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही’ हा आमचा जनलोक संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.
