• Thu. Oct 16th, 2025

वर्तणूक नियमांचा भंग करणाऱ्या त्या गटशिक्षणाधिकारीच्या निलंबन करा

ByMirror

Jun 21, 2024

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी

स्वतःचे पती व इतर शिक्षकांच्या तोंडी बदल्या केल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिकारात नसताना स्वतःचे पती व इतर शिक्षकांच्या बदल्या करून वर्तणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांचे निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हा अध्यक्ष विजय शिरसाठ यांनी शिष्टमंडळासह जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी संतोष पाडळे, विशाल भिंगारदिवे, संदीप वाघचौरे आदी उपस्थित होते.


अधिकार कक्षेत नसताना प्राथमिक शिक्षकाच्या बदल्या केल्या म्हणून अकोलेचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच पद्धतीने कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी देखील अनेक शिक्षकांच्या तोंडी बदल्या केल्या होत्या. कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या विषयी या संदर्भात अनेक सामाजिक संघटना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून कारवाईची मागणी केली आहे. तर काही वकिलांनी या विषयावर मुख्यकार्यकारी अधिकारी यांना नोटीस देखील दिली आहे. तरी त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना पाठिशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे काही वर्षापूर्वी एका मुख्यध्यापकाने शाळेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांचे निलंबन करण्याऐवजी त्यांच्याकडे कोपरगाव गट शिक्षण अधिकारी पदाचा कार्यभार ठेवून त्यांना बक्षीस देण्यात आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

तर इतर तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे कोपरगावचा गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार देण्यात यावा व वर्तणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांचे निलंबन करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *