भारताची प्रगती, शांतता आणि एकात्मतेसाठी प्रार्थना
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगर येथील मदिना मस्जिदमध्ये रमजान ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी भारताच्या प्रगतीसाठी तसेच देशात अमन व शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
रमजान महिना हा प्रेम, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारा पवित्र महिना आहे. या महिन्यात मुस्लिम समाज महिनाभर रोजे (उपवास) ठेवून शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र, म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करतो. ईद-उल-फित्रच्या दिवशी गांधीनगरच्या मस्जिदमध्ये नमाज अदा करून देशाच्या प्रगतीसाठी, तसेच देशात शांतता आणि सौहार्द टिकून राहावे यासाठी अल्लाहकडे विशेष दुआ करण्यात आली. या नमाजमध्ये परिसरातील हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
या प्रसंगी नगर जिल्ह्यात जातीभेद विसरून सर्व समाजाने एकोप्याने राहावे, यासाठी देखील प्रार्थना करण्यात आली. नमाजनंतर उपस्थितांनी एकमेकांना “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देत बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश दिला. ईदच्या निमित्ताने गरीब व गरजू नागरिकांना मदत करण्याचेही आवाहन करण्यात आले. तसेच या दिवशी घरोघरी पारंपरिक शीरखुरमा आणि खाद्यपदार्थ तयार करून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी मौलाना इर्शाद रझवी आलम यांनी सामुदायिक नमाज पठण करुन एकात्मतेचा संदेश दिला. तसेच मदिना मस्जिदचे अध्यक्ष नुरमहंमद शेख, चांद शेख, रज्जाक शेख, महेबूब शेख, लतीफ बेग, अजीजखा पठाण, जब्बार शेख, युनुस बेग,दिलावर शेख, आयुब शेख, राजू शेख, मुख्तार शेख, इस्राईल पठाण, फारुख पठाण, फिरोज शेख, रिजवान शेख तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
