गद्य-पद्याची नशा केल्यास जीवनात शान निर्माण होते -बाबासाहेब सौदागर
गणराज प्रकाशनाच्या 190 व्या ग्रंथाचे प्रकाशन
नगर (प्रतिनिधी)- मद्याची नशा केल्यास मनुष्य उलटा होतो. तर गद्य-पद्याची नशा केल्यास जीवनात शान निर्माण होते. कविता, साहित्य व्यक्तीला भरभरुन देते, साहित्यिकांना समाजात धनसंपत्ती, मान सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देते. शाल्मली ललित ग्रंथाच्या रूपाने मराठी साहित्याला आणखी एक अलंकार प्राप्त झाला असल्याचे प्रतिपादन गीतकार व सिने कलाकार बाबासाहेब सौदागर यांनी केले.
सामाजिक व सौंदर्य शास्त्र अंतर्भूत असलेल्या आणि मानवी जीवनाचे मुळ सांगणाऱ्या गणराज प्रकाशन प्रकाशित लेखक पद्मनाभ हिंगे लिखित शाल्मली ललित ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन चितळे रोड येथील, जिल्हा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात झाले. यावेळी सौदागर बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ संदिप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी चंद्रकांत पालवे, मसापचे केंद्रीय सदस्य जयंत येलुलकर, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, साहित्यिक स्वाती अहिरे, अमोल इथापे, लेखक पद्मनाभ हिंगे, प्रकाशक प्रा. गणेश भगत आदींसह शहरातील साहित्य प्रेमी व हिंगे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे सौदागर म्हणाले की, कवितेचे प्रवाह बदलत चालले असून, खोट्या कविता मनाला भिडत नाही. या उलट अस्सल कवितांमधून जीवनाचा संघर्ष व भावअर्थ उलगडतो. शाल्मलीद्वारे ललित कथेचा सर्वोत्तम प्रयोग मराठी साहित्याला मिळाला आहे. कविता हसण्यावरती घेण्याची गोष्ट नाही, विनोदी कविता वात्रटपणाने बिघडविण्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तर शब्दांचे भाव अर्थ, गमती-जमतीचा उलगडा त्यांनी केला.
प्रास्ताविकात गणेश भगत यांनी गणराज प्रकाशन जुन्या-नवीन साहित्यिकांना एकत्रित बांधण्याचे काम करत आहे. शाल्मली ललित ग्रंथाच्या रुपाने 190 व्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. नवोदित साहित्य वाचकांपर्यंत आणण्याचे कार्य गणराज प्रकाशनच्या माध्यमातून केले जात आहे. लेखक पद्मनाभ हिंगे राजकारण, समाजकारणानंतर शेती करुन साहित्य चळवळीत योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. पद्मनाभ हिंगे यांच्या 72 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त 72 दिव्यांनी औक्षण करुन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. संदीप सांगळे म्हणाले की, साहित्य, काव्य मराठी साहित्याचा केंद्र आहे. साहित्य समाज जीवनाचा आरसा असतो. जीवनाचे अनुभव यामध्ये उमटत असतात. तेच भाव या ललित ग्रंथात उतरले आहे. सामाजिक भान, जीवनाचे मिश्रण या ग्रंथात समाविष्ट असून, शाल्मली ललित ग्रंथ हा मराठी साहित्यासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे ते म्हणाले.
लेखक पद्मनाथ हिंगे यांनी वाचनातून साहित्य निर्मितीची ओढ लागली. शालेय जीवनापासूनच वाचन आणि कवितेची आवड निर्माण झाली. आजच्या युवा पिढीने मोबाईल दूर करून पुस्तक वाचली पाहिजे. पुस्तके जीवनात आनंद निर्माण करुन दिशा देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. तर कविता करतानाचा प्रवास त्यांनी उलगडला.
जयंत येलुलकर यांनी साहित्यातून जीवनाचे गमक उमटत असते. साहित्य जीवनाला आनंद व दिशा देतात. वयाच्या पन्नाशीनंतर जीवनाचा खरा उलगडा होतो. ते शब्दबद्ध झाल्यास नवीन पिढीला हा ठेवा मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले. कवि चंद्रकांत पालवे म्हणाले की, लेखकाने कविता मधून तारुण्याचा भाव जपला. या ललित ग्रंथातून भाव जपताना आणि जगताना मनोधर्म जिवंत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वाती अहिरे यांनी प्रेम, सामाजिक जाणीव आणि जीवनातील विद्रोह असे परिपूर्ण शाल्मली ललित ग्रंथ वाचकांच्या पसंतीस उतणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश चव्हाण यांनी केले. आभार अनुपम हिंगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिती टांक, प्रशांत टांक, आनंदराज भगत, श्यामा मंडलिक आदींनी परिश्रम घेतले.