• Thu. Oct 16th, 2025

दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय महापालिकेने रद्द करावा

ByMirror

Jan 16, 2025

शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन

पाणीपट्टी वाढचा निर्णय अन्यायकारक -सचिन जाधव

नगर (प्रतिनिधी)- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. तर वाढ करण्यात आलेली पाणीपट्टी अन्यायकारक असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.


याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, काका शेळके, आकाश कातोरे, अमोल हुंबे, प्रल्हाद जोशी, दिगंबर गेंट्याल, विशाल शितोळे, पुष्पाताई येलवंडे, सलोनीताई शिंदे, सचिन शिरसाठ आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


स्थायी समितीच्या वतीने 7 जानेवारी रोजीच्या ठरावाने महानगरपालिका हद्दीतील सध्याची वार्षिक पाणीपट्टी दीड हजार वरुन दुप्पट करून तीन हजार करण्यात आलेली आहे. सदरच्या वाढीव पाणीपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर फार मोठा बोजा पडणार आहे. अजून नगर शहराची फेज टू पाणी योजना पूर्णत्वास गेलेली नाही. ही पाणी योजना चालू करण्यात आली नसून, बऱ्याच लोकांच्या पाणी प्रश्‍ना संदर्भातील वारंवार तक्रारींना नगरसेवकांना तोंड द्यावे लागते. तर नागरिकांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये काही कारण नसताना दुपटीने पाणीपट्टी वाढविणे ही बाब अन्यायकारक असल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


सर्व बाबींचा विचार करून वाढीव पाणीपट्टीचा मंजूर केलेला ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
–—
शहरात दुपटीने पाणीपट्टी वाढचा निर्णय अन्यायकारक आहे. फेज टू ची योजना कार्यान्वीत नसताना व अनेक भागात पुरेश्‍या प्रमाणात पाणी येत नसताना ही वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा गांभीर्याने विचार करुन, सर्वसामान्य नागरिकांवर कराचा बोजा टाकणे चूकीचे ठरणार आहे. पाणी हे सर्वसामान्यांना गरजेचे असून, त्यासाठी अव्वाच्यासव्वा वसुलीचा निर्णय रद्द करण्यात यावा. -सचिन जाधव (शहर प्रमुख, शिवसेना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *