शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी दिवंगत माजी आमदार कॉ. ठुबे यांनी कार्य केले -कॉ. गायकवाड
अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी दिवंगत माजी आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांनी कार्य केले. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी त्यांचे कार्य सुरु होते. शेतकऱ्यांची कामधेनु म्हणून पारनेर साखर कारखाना ठुबे यांच्या काळात उत्तमपणे चालला असल्याचे प्रतिपादन कॉ. नारायणराव गायकवाड यांनी केले.
कान्हूर पठार (ता. पारनेर) येथे पारनेरचे दिवंगत माजी आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉ. गायकवाड बोलत होते.

कॉ. एस.एल. ठुबे म्हणाले की, पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्याची जाणीव व ओळख महाराष्ट्र शासनाला निर्माण करून देणारे आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांची ख्याती होती. शासन दरबारी दुष्काळी भागातील प्रश्न मांडून दबदबा निर्माण करणारे ते एकमेव आमदार ठरले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. द.मा. ठुबे गुरुजी यांनी गावाचे व तालुक्याच्या विकासासाठी आमदार ठुबे यांनी भरीव कार्य केले असल्याचे सांगितले.
भाकपचे सचिव कॉ. संतोष खोडदे यांनी पुरोगामी विचाराचे गाढे अभ्यासक व मार्क्सवादी विचारांचा पगडा असणारे दिवंगत आमदार ठुबे यांनी शेतकरी व कामगार हिताचे कार्य केले असल्याचे सांगितले. यावेळी कॉ. बापूसाहेब कुमठकर, रावसाहेब फुलमाळी, युसुफ इनामदार, अब्बास मुजावर, बाबू पाटील ठुबे आदींसह गावातील प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.