‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त सामाजिक उपक्रम
सायकल रॅली, कीर्तन, माहितीपटाने परिसर भक्तिमय; 153 रक्तपिशव्यांचे संकलन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गोविंदपूरा परिसरातील ऐतिहासिक गुरुद्वारा भाई दया सिंगजी येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर तसेच जनजागृतीपर सायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासन, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर महानगरपालिका व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम पार पडला. या उपक्रमाला समाजबांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गुरुद्वारा परिसरात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात एक हजारपेक्षा अधिक नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या शिबिरामुळे परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. जिल्हा रुग्णालय व महापालिका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकांनी तपासण्या करून आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच विविध तपासण्या व औषधोपचाराची देखील व्यवस्था करुन देण्यात आली होती.
या निमित्ताने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात समाजबांधवांसह महिलांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. एकूण 153 रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गुरुद्वारा परिसर गजबजून गेले होते.
सकाळी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचारांचा संदेश देणारी सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप गुरुद्वारा येथे झाला. या रॅलीत युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता.
रॅलीच्या स्वागतप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, गुरुद्वाराचे अध्यक्ष सरदार बलदेवसिंह वाही व शीख समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचवेळी मान्यवरांच्या हस्ते आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यस्तरीय समागम समितीच्या सदस्या नवनीत कौर, परमजीत कौर, आमदार संग्राम जगताप, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव तसेच नगरसेवक उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले की, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त देशभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. धर्मरक्षणासाठी दिलेले त्यांचे बलिदान आजही प्रेरणादायी आहे. शासनाच्या माध्यमातून हा संदेश सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचवला जात आहे. नवी मुंबई येथे होणाऱ्या भव्य महान शहिदी समागमासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरातून जाण्यासाठी मोफत व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गुरुद्वारामध्ये कीर्तन व कथांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी इतिहासावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी ‘हिंद दी चादर’ हे भावस्पर्शी गीत सादर करण्यात आले. या सर्व कार्यक्रमामुळे परिसर भक्तिमय व प्रेरणादायी वातावरणाने न्हाऊन निघाला.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. गुरुद्वारा भाई दया सिंगजीचे अध्यक्ष सरदार बलदेवसिंह वाही व सेवेदार यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी आयोजनाबद्दल समाजबांधवांनी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
दरम्यान, दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी खारघर, नवी मुंबई येथे होणाऱ्या भव्य महान शहिदी समागमास सर्व संगतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
