वारंवार विद्युत पुरवठा खंडित व कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने नागरिक वैतागले
सुरळीतपणे विद्युत पुरवठा करण्याचे विद्युत महावितरणला निवेदन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथे मागील एक महिन्यापासून दररोज सकाळी होणारा विद्युत पुरवठा खंडित व कमी दाबाने विद्युत पुरवठ्याने त्रासलेल्या नागरिकांनी सुरळीतपणे विद्युत पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन विद्युत महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. निवेदनावर अशोक शिंदे, बिलाल बागवान, रेश्मा बागवान, शाहिन शेख, समिना शेख, कादर सय्यद, इरशाद बागवान, हसिना शेख, खलील शेख आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर भागात विद्युत पुरवठा करणारे दोन लाईन असून, त्यापैकी एका लाईनवरुन अनेक घरांना वीज पुरवठा होत आहे. मात्र मागील एक महिन्यापासून त्या लाईनची दररोज सकाळी लाईट जाणे किंवा विद्युत पुरवठा कमी दाबाने होणे, अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
दररोज हा प्रकार सुरु असून, या भागातील सबंधित कर्मचारी वर्गाला सांगून देखील या प्रश्नाची सोडवणुक करण्यात आलेली नाही. दररोज सकाळी घरात वीज नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एक प्रकारे भारनियमन झाल्यासारखे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना कराव्या. अन्यथा नागरिकांनी महावितरण कार्यालयात येवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.