• Sun. Jun 1st, 2025

कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केंद्राबद्दल जागृती

ByMirror

May 13, 2025

लवकरात लवकर वाद मिटवून नाते टिकवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची -न्यायाधीश संगीता ना. भालेराव

नगर (प्रतिनिधी)- आपापसातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी ही परिणामकारक प्रक्रिया आहे. आई-वडिलांच्या वयात मुलांची फरफट होवू नये याची काळजी घ्यावी. वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या दोन्ही पक्षकारांनी मध्यस्थीने वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जुनी प्रकरणे निकाली होण्यासाठी मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. मध्यस्थी करत असताना झालेली चर्चा पूर्णत: गोपीनीय असते. मध्यस्थीत तोडगा न निघाल्यास त्या चर्चेचा सदर प्रकरणावर देखील कोणताही परिणाम होत नसल्याचे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता ना. भालेराव यांनी केले.


कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमात न्यायाधीश भालेराव बोलत होत्या. कौटुंबिक न्यायालय झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. राजेश कावरे, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, सचिव रोहिणी उंडे-नगरकर, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे आदींसह वकील, कौटुंबिक न्यायालयाचे कर्मचारी आणि पक्षकार उपस्थित होते.


औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश समीना खान, कामगार न्यायालयाचे प्रशासकीय न्यायाधीश एस.जी. देशपांडे, द्वितीय न्यायाधीश ए.जी. देशमुख, सहकार न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. लखोटे यांची बदली झाल्याबद्दल त्यांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. तर पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


प्रास्ताविकात ॲड. लक्ष्मण कचरे यांनी आजच्या काळात मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व विशद करुन, यामध्ये दोन्ही पक्षकारांचा वेळ व पैसा वाचून समुपदेशनाने वाद मिटत असल्याचे स्पष्ट केले. ॲड. शिवाजी कराळे म्हणाले की, कौटुंबिक वाद मध्यस्थीद्वारे मिटवले जाऊ शकतात. दोन्ही पक्षकारांचा यामध्ये फायदा व समाधान असतो. वर्षानुवर्षे चाललेल्या प्रकरण अल्पावधीत चर्चेने व समोपचाराने मिटून एकमेकांबद्दल असलेली कटुता दूर होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राजेश कावरे यांनी केले. आभार ॲड. सुरेश लगड यांनी मानले. यावेळी कौटुंबीक न्यायालयीन कर्मचारी प्रबंधक एस.व्ही. मोहोळकर, सहाय्यक अधीक्षक ए.आय. शेख, लघुलेखिका एस.ए. चव्हाण, लिपीक ए.पी. झिंजे, आर.एन. गुंडू, डी.ए. नारखेडे, ए.एस. तगारे, आर.ए. मोरे, शिपाई आळकुटे, जाधव आदींसह औद्योगिक व कामगार न्यायालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *