ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ विधीज्ञांचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रामदास सूर्यवंशी यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या गौरव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते ॲड. सूर्यवंशी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा सरोज आल्हाट, साहित्यिक भारत सातपुते, संमेलनाचे संयोजक व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, कवी संमेलनाचे अध्यक्ष रज्जाक शेख, गीताराम नरवडे, साहेबराव बोडखे, बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. रामदास सूर्यवंशी हे जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून विधीज्ञ क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या वकिलीच्या माध्यमातून सर्वसामान्य आणि गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. विशेषतः गरीब, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी ते विनामोबदला सेवा देत असून, त्यांच्या न्यायहक्कासाठी लढा देत आहेत.
त्यांच्या या निस्वार्थ कार्याबद्दल त्यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.