• Tue. Jul 22nd, 2025

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

ByMirror

Feb 20, 2024

बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेने पत्रकारिता केली -संदीप मिटके

अहमदनगर (प्रतिनिधी)- आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारितेपुरते मर्यादीत नव्हते, ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. समाजाचे आपण घटक आहोत, सामाजिक दायित्वाच्या भावनेने त्यांनी पत्रकारिता केली. पारतंत्र्यात असताना समाज जागृतीचे कार्य करुन विधवा पुनर्विवाहासाठी त्यांचे विशेष योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपाधीक्षक अधिकारी संदीप मिटके यांनी केले.


मराठी पत्रकारितेचे जनक तथा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मंगळवारी (दि.20 फेब्रुवारी) मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने साजरी करण्यात आली. झेंडीगेट येथील परिषदेच्या संपर्क कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मिटके बोलत होते. यावेळी पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजीटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अफताब शेख, ज्येष्ठ पत्रकार भुषण देशमुख, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे महेश महाराज देशपांडे, अनिल हिवाळे, अमित आवारी, समीर मन्यार, आबिद दुल्हेखान, विनायक लांडे, वाजिद शेख, प्रसाद शिंदे, राजेंद्र येंडे, शब्बीर शेख, अनिकेत गवळी, अकिस सय्यद आदींसह पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


पुढे मिटके म्हणाले की, आचार्य जांभेकर यांना अनेक देशी भाषांसह परदेशी भाषांवर देखील प्रभुत्व होते. फ्रेंच आणि पारसी भाषा पारंगत असल्यामुळे फ्रान्सच्या राजांनी देखील त्यांचा सन्मान केला. भाषाशास्त्र बरोबर विविध शास्त्रांचा देखील त्यांचा अभ्यास होता. 21 व्या शतकातील नीतीशास्त्र व छंदशास्त्र त्यांनी त्यांच्याकाळात अभ्यासले व त्यावर पुस्तके लिहिली. त्यांनी सुरु केलेले दर्पण या एकाच मराठी वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेत दोन कॉलममध्ये छापले जायचे. ब्रिटिशांना भारतीयांच्या अडीअडचणी समजाव्या व सर्व परिस्थिती भारतीयांना समजण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यांची पत्रकारिता आजच्या समाजाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


महेश महाराज देशपांडे म्हणाले की, बदलत्या काळानुरूप पत्रकारितेचे संदर्भ व स्वरुप बदलत असताना बाळशास्त्री जांभेकर यांचा वैचारिक वारसा पत्रकारांना पुढे घेऊन जावा लागणार आहे. हे विचार प्रत्येक पत्रकाराच्या मनात बिंबवण्यासाठी त्यांचे स्मरण केले जात आहे. शहाणे करून सोडावे सकलजन! हे बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा प्रमुख उद्देश होता. तर व्यवस्थेसमोर समाजाच्या वेदना मांडणे हाच पत्रकारितेचा प्रामाणिक हेतू घेऊन त्यांनी कार्य केले. तोच वारसा सर्वांना पुढे घेऊन जायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


भूषण देशमुख म्हणाले की, आदर्श पत्रकाराचे मूर्तीमंत उदाहरण बाळशास्त्री जांभेकर आहेत. अनेक शास्त्रात पारंगत असलेला विद्वान पत्रकारितेला लाभला. नव्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा व पत्रकारितेची त्यांनी दिलेली मूल्ये जोपासावी. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारिता इतर राज्यांपेक्षा सकस असून, ही जांभेकर यांची पुण्याई आहे. ज्ञानोदय रूपात शहरात वृत्तपत्र सुरू झाले. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चालवले गेलेले हे वृत्तपत्राने पुरोगामी विचार रुजवल्याचे त्यांनी सांगितले.


विजयसिंह होलम म्हणाले की, आत्ताची व पूर्वीची पत्रकारिता आणि वृत्तपत्र चालविणे नेहमीच कठीण राहिले आहे. मात्र पत्रकार व वृत्तपत्र कसे असावे? याचे मुल्य त्यांनी समाजा समोर ठेवले. भारतातील प्रिन्ट मिडिया जगात अग्रेसर आहे. कोरोना नंतर झालेली पिछेहट भरुन निघत असून, 2024 वर्षात वाटचाल करताना प्रिंट मीडियाला चांगले दिवस येत आहे. डिजीटल व सोशल मीडियाच्या प्रभावाने पत्रकारितेचे स्वरूप बदलत असताना प्रिंन्ट मीडिया हा पत्रकारितेचा पाया आहे. बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा सांगणाऱ्या पत्रकारितेचा मुळ गाभा बदलता कामा नये, हे टिकवणे सर्व पत्रकारांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यकांत नेटके यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *