• Tue. Jun 3rd, 2025

26-11 चा मानवतेवर झालेला भ्याड हल्ला -आ. संग्राम जगताप

ByMirror

Nov 27, 2022

26-11 ला मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना हुतात्मा स्मारकात श्रध्दांजली

अहमदनगर (प्रतिनिधी)- 26-11 चा मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा मानवतेवर झालेला भ्याड हल्ला होता. देशातील तो काळा दिवस होता. दरवर्षी घेतल्या जाणार्या या श्रध्दांजली कार्यक्रमाने पुढील पिढीला देखील शहिदांचे बलिदान व त्यागाचे स्मरण राहणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.


26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलीसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, मराठी पत्रकार परिषद, लिओ क्लब ऑफ अहमदनगर व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते. यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूर शेख, लायन्स क्लबच्या अध्यक्षा सिमरनकौर वधवा, लिओ क्लबच्या अध्यक्षा हरमनकौर वधवा, झोन चेअरमन आनंद बोरा, प्रकल्प प्रमुख हरजितसिंह वधवा, धनंजय भंडारे, दिलीप कुलकर्णी, कमलेश भंडारी, डॉ. संजय असनानी, कैलास नवलानी, प्रिशा बजाज, धारवी पटेल, गुरनूर वधवा, आशा पालवे, प्रशांत नेटके पोलीस बॉईज संघटनेच्या विद्या तन्वर, अलकनंदा पालवे, विजया उल्हारे, वसतीगृह अधीक्षका ज्योती मोकळ, प्रदीप चन्ना, ओम कदम आदींसह नागरिक व रयत शिक्षण संस्थेच्या जिजामाता कन्या निवास वसतीगृहाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यात देश रक्षणासाठी वीर पोलीस व जवानांनी प्राणाची बाजी लावली. यामध्ये अनेक शहिद झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या शहिदांनी दिलेल्या प्राणाची आहुतीचा नागरिकांना विसरत पडता कामा नये, असे त्यांनी सांगितले.
हुतात्मा स्मारकावर आमदार जगताप व पोलीस निरीक्षक गडकरी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. उपस्थित युवक-युवती, नागरिक व विद्यार्थिनींनी भारत माता की जय…, वंदे मातरम…च्या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला. गायक संतोष पानसरे, विजय आंग्रे, आमीन धारानी व जिजामाता कन्या निवास वसतीगृहाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीवर गीते सादर केली. कार्यक्रमाचे वातावरण देशभक्तीने प्रफुल्लीत झाले होते.


प्रास्ताविकात सिमरनकौर वधवा यांनी कुटुंबापेक्षा समाजाच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन पोलीस दल व लष्करातील अधिकारी, कर्मचारी कर्तव्य बजावतात. जीवाची बाजी लावून ते सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले.


पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी म्हणाल्या की, नागरिकांच्या संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व लष्करातील जवानांना प्रति कृतज्ञता ठेवणे हे सामाजिक कर्तव्य आहे. सर्व काही त्याग करून ते देश रक्षणाचे कार्य करत असतात. मुंबईच्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहिदांनी देशासाठी दिलेले बलिदान स्मरणात ठेऊन नागरिकांनी देखील समाजासाठी काही केले पाहिजे ही जाणीव ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार हरजितसिंह वधवा यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *