शिक्षण व संस्काराची शिदोरी गुरुजनांकडून मिळते -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करुन गुरुपूजन केले.
कार्यक्रमाचे प्रारंभ राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिता काळे म्हणाल्या की, एकविसाव्या शतकातही सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी गुरुंची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षण व संस्काराची शिदोरी गुरुजनांकडून मिळत असते. फक्त उच्च शिक्षण देऊन विद्यार्थी घडणार नसून, त्याला संस्काराची जोड द्यावी लागणार आहे.

गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून मुलांमध्ये गुरुंबद्दल आस्था व आदर निर्माण होत असतो. राजमाता जिजाऊ सारखे गुरु लाभल्याने शिवाजी महाराजांनी खर्या अर्थाने स्वत:चे राज्य निर्माण केले. गुरु हे शिष्याला दिशा देत असतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुंच्या आज्ञेचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेखा वाघ व शितल आवारे यांनी गुरु विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन एकलव्याचा आदर्श घेणे काळाची गरज आहे. शिक्षक गुरुंच्या भूमिकेत आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरुचे महत्त्व विशद केले. मुलांना यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले.