• Wed. Oct 15th, 2025

खानापूर येथील तो रस्ता चोरीला गेल्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

ByMirror

Aug 5, 2023

जातीय द्वेषातून खासगी जागेत गटारीचे पाणी सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील खानापूर (ता. शेवगाव) ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याने भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. तर खासगी प्लॉट मध्ये जातीय द्वेषातून ग्रामसेवक व सरपंच यांनी गावातील गटारीचे पाणी सोडल्याचा आरोप करुन त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


गायकवाड यांचा खानापूर गावात 139 व 140 नंबरचा प्लॉट आहे. या प्लॉट मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर चर खोदून व काटे टाकून रस्ता बंद करण्यात आल्याने गायकवाड यांना स्वत:च्या जागेत जाता येत नाही. हा रस्ता अतिक्रमण करुन बंद करणाऱ्यांनी चोरला असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. तर जातीय द्वेषातून ग्रामसेवक व सरपंच यांनी सदरील प्लॉटमध्ये गावाच्या गटारीचे घाण पाणी सोडल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


सदर रस्ता चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी व खासगी प्लॉटमध्ये गटारीचे घाण पाणी सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. अन्यथा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर 14 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर कुटुंबीयांसह उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *