पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महिलांनी केली पूजा
गाव हरित व सुंदर होण्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्यावे -पै.नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी मागील दोन ते तीन वर्षापूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करुन वटपौर्णिमा साजरी केली. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तर सात ही जन्मात हाच पती मिळो, व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने काही वर्षांपूर्वी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली होती.
बहरलेल्या त्या झाडाच्या सावलीत गृहिणींनी वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी आशाबाई ठाणगे, सखुबाई डोंगरे, तेजस्विनी डोंगरे, कोमल ठाणगे, जया डोंगरे, प्रियंका डोंगरे-ठाणगे, मंदाताई डोंगरे, विमल ठाणगे, निर्मला डोंगरे, शांताबाई डोंगरे, राधिका डोंगरे, सुनिता डोंगरे आदी महिला उपस्थित होत्या.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, गाव हरित व सुंदर बनविण्यासाठी ग्रामस्थांनी वृक्ष लागवड चळवळीत योगदान द्यावे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करुन, त्याचे संगोपन करणे काळाची गरज बनली असल्याचे सांगून, त्यांनी वडाच्या झाडाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व विशद केले. तर दरवर्षी डोंगरे सामाजिक संस्थेच्या वतीने वटपौर्णिमेला वडाची झाडे लावून त्यांचे संवर्धनही केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.