• Sat. Jul 27th, 2024

दाभोळकर आणि पानसरे हत्याकांड खटल्याकडे ॲड. निकम यांनी दुर्लक्ष केले

ByMirror

May 15, 2024

लोकभज्ञाक चळवळीचा आरोप

कोणत्याही गरिबाच्या कामासाठी ॲड. निकम वेळ देऊ शकलेले नाही -ॲड. गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबईच्या धारावी झोपडपट्टी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून उभे असलेल्या ॲड. उज्वल निकम यांनी ते महाराष्ट्र शासनाचे स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून काम करत असताना त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्याकांड खटल्याकडे शेंडी-शेंदूर तत्वज्ञानाचा आहारी जाऊन दुर्लक्ष केल्याचा आरोप लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने करण्यात आला आहे.


नुकतेच पुणे सेशन कोर्टात दाभोळकर हत्याकांड खटल्याचा निकाल होऊन मुख्य आरोपी निर्दोष मुक्त झाला आणि इतर दोन लोकांना जन्मठेप झाली. ॲड. निकम यांनी त्या काळातील भाजपचे सत्ताधारी मुख्यमंत्री यांच्याशी जवळीक ठेवून शेंडी-शेंदूर तत्वज्ञान न्यायालयाच्या कामात देखील वापरले. या दोन्ही खून खटल्यात शेंडी-शेंदूरवाले आकंठ बुडालेले असल्याची माहिती असताना सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या माध्यमातून सखोल चौकशी केली नाही. तपासात अनेक त्रुटी ठेवल्याचा परिणाम या दोन्हीही खटल्यांमध्ये आरोपींना फाशी होण्याऐवजी फायदा मिळाला असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.


महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकारी वकील सत्ताधाऱ्यांची जवळीक करून नेमणुका मिळवितात. त्यामुळे ॲड. उज्वल निकम यांनी पानसरे आणि दाभोळकर खटल्याकडे कायमचे दुर्लक्ष केले. विशेष गोष्ट म्हणजे ज्या केस मध्ये फार प्रसिद्धी मिळालेली आहे, अशा केस आपल्याकडे ओढण्यासाठी ते माहीर होते. कसाबच्या खटल्यात हजारो डोळ्यांनी पाहिलेले साक्षीदार होते. अशावेळी ॲड. निकम यांच्या ऐवजी दुसरा कोणताही अभ्यासू वकील कसाबला फाशी देणारी सजा मिळवल्याशिवाय राहिला नसता.


ॲड. निकम हे पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरणारे वकील आहे. ते कधीही धारावी झोपडपट्टीच्या कोणत्याही गरिबाच्या कामासाठी वेळ देऊ शकलेले नाही. त्यांना खासदार करणे म्हणजे गरिबांसाठी पांढरा हत्ती संसदेत पाठवणे असा अर्थ होणार आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या शिक्षण मंत्री राहिलेले वर्षा गायकवाड यांना निवडून देणे उचित ठरणार आहे. सर्व धर्माचे खरे तत्त्वज्ञान लोकभज्ञाक हेच आहे. सजीवांमध्ये असणारे चैतन्याची पूजा करणे आणि त्यासाठी काम करणे ही बाब ॲड. निकम यांच्या समजण्यापलीकडची असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. लोकभज्ञाक चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी ॲड. गवळी, ओम कदम, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *