कौटुंबिक वादांच्या जलद निपटाऱ्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कौटुंबिक न्यायालयात नुकत्याच न्यायाधीश म्हणून रुजू झालेल्या वर्षा पारगावकर यांचे कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, शिवाजी कराळे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. राजेश कावरे, ॲड. शिवाजी सांगळे, ॲड. रघूनाथ बनकर, ॲड. संतोष कांडेकर, ॲड. वसीम खान, ॲड. अरुणा राशिनकर, ॲड. मनोज जायभाय, ॲड. कौस्तुभ कुलकर्णी, ॲड. रघूनाथ मुरुमकर यांच्यासह कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक नितीन धोंगडे, सहाय्यक अधीक्षक आसिफ शेख, रोहित गुंडू, धीरज नारखेडे, अर्चना झिंजे, एस. एस. चव्हाण, विकास वाघमारे, तुषार गुंड, श्रीमती एस. एस. पगारे, श्रीमती जाधव तसेच न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
न्यायाधीश वर्षा पारगावकर या यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. न्यायिक सेवेमधील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि कार्यकुशलतेमुळे न्यायव्यवस्थेत त्यांनी विशेष ठसा उमटविला आहे. नुकतीच त्यांची बदली होऊन त्या अहिल्यानगर येथील कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू झाल्या आहेत.
स्वागत समारंभात उपस्थित मान्यवरांनी पारगावकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कौटुंबिक न्यायालय हे समाजातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयांशी निगडित असल्याने न्यायदान प्रक्रियेत समन्वय, संवेदनशीलता आणि न्यायनिष्ठा यांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ न्यायालयीन कामकाजाला होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कामकाज अधिक प्रभावी, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी वकील संघाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमात न्यायालयीन कामकाज, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक समन्वय यावरही चर्चा करण्यात आली.
